केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदाची माहिती जाहिरातीद्वारा प्रसिद्ध केली जाते. त्यावर नजर टाकल्यास दरवर्षी केंद्रीय पातळीवर ८॰॰ ते १० हजार तर राज्यपातळीवर ३ ते ५ हजार एवढी शासकीय पदे भरली जातात, हे लक्षात येते. मात्र त्यासाठी सुमारे अडीच ते तीन लाख विद्यार्थी अर्ज करीत असतात. म्हणजे व्यापक स्वरूपातील स्पर्धेमुळे अंतिमत: निवड होणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे अत्यल्प असते. नियोजित अभ्यास, जिद्द, चिकाटी या आधारे यश मिळवता येते, यात शंका नसली तरी, या व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव असणे हे प्रत्येक विद्यार्थी, पालक व मार्गदर्शकांची जबाबदारी आहे. त्यामुळे या परीक्षांकडे वळण्यापूर्वी अथवा वळत असताना आपल्याकडे एखादा पर्याय असणे अथवा त्याचा विचार केलेला असणे अत्यावश्यक ठरते. एकदा या पर्यायाचा विचार केला की, मग आपली सर्व ऊर्जा या परीक्षांच्या तयारीत गुंतवणे अधिक सोयीस्कर ठरते. अन्यथा या परीक्षांत अपयश आले आणि आपण पर्यायाचा अजिबातच विचार केलेला नसेल तर विद्यार्थी निराश होण्याचीच शक्यता असते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेलाच सर्वस्व मानता कामा नये. म्हणजे, यात यश प्राप्त झाले तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो आणि या परीक्षेत अपयशी ठरलो तर आपले जीवनच निरर्थक आहे, अशा रीतीने स्पर्धा परीक्षेचा विचार करणे धोकादायक आहे. यातून आपण आपलेच खच्चीकरण करण्याची शक्यता अधिक आहे. वस्तुत: विद्यार्थी सर्वस्व पणास लावून उमेदीची काही वर्षेया परीक्षांचा अभ्यास करतात. मात्र तरीही पदरी आलेल्या अपयशाला सामोरे जाणे, अत्यंत कठीण असले तरी, त्याचा समर्थपणे स्वीकार करावा लागतो.
काही विद्यार्थी क्षमता असून आणि प्रयत्न करूनही अपात्र ठरतात, यास अनेक घटक कारणीभूत असतात. म्हणूनच आपल्या बाबतीत असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची जाणीव असणे संयुक्तिक ठरते. थोडक्यात यूपीएससी-एमपीएससी म्हणजे जीवन नव्हे याचे भान ठेवून आपण ठरवलेल्या कालमर्यादेत या परीक्षांचा प्रभावी अभ्यास करण्यावर लक्ष देणे साहाय्यभूत ठरेल.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भातील आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांने आपल्या आयुष्यातील किती वर्षे यासाठी राखीव ठेवावीत, हा होय. खरे पाहता एक वर्षांचा ११-१२ तासांचा नियोजित व परीक्षाभिमुख अभ्यास ही या परीक्षेची किमान गरज आहे, हे लक्षात येते. त्यानंतर प्रत्यक्ष
परीक्षा प्रक्रियेचे एक वर्ष अशी एकूण पूर्ण दोन वर्षे या परीक्षांसाठी निर्धारित करावीत. दोन वर्षांचा अभ्यास आणि एका संपूर्ण परीक्षेचा अनुभव हे या परीक्षेसाठी किमान प्रयत्न मानता येतील. या प्रयत्नात यश प्राप्त झाले तर प्रश्नच नाही. मात्र, अपयश आले तर या टप्प्यावर एका बाजूला स्पर्धा परीक्षा देताना, पर्यायी करिअरची सुरुवात करणे उपयुक्त ठरते.