खलनिग्रहणाय सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपणा-या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची आज समाजव्यवस्थेला नितांत गरज आहे. किरण बेदी, जे.एफ. रिबेरो यांच्यासारख्या पोलीस अधिका-यांनी स्वतःच्या करियरसोबतच समाजाचं ऋणही फेडलेलं आहे. पोलीस अधिकारी बनण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अशाच काही करियर मार्गाची ओळख करून घेणार आहोत.
भारतीय पोलीस सेवेमध्ये जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आय.पी.एस.मध्ये निवड झाल्यानंतर हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकाडमीमध्ये उमेदवारांना खडतर प्रशिक्षण दिलं जातं. सबडिव्हिजन स्तरापासून राज्यस्तरापर्यंत नेतृत्वगुणविकासाचं शिक्षण दिलं जातं. प्रश्नांचं विश्लेषण करणं, ते सोडवण्यासाठी योजना आखणं, व्यक्तिगत प्लॅन बनवणं आदी गोष्टींचं प्रशिक्षण येथे दिलं जातं.यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर विविध राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशात नेमणूक होते. आय.पी.एस. अधिका-यांची पहिली नेमणूक असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस किंवा सब-डिव्हिजनल पोलीस ऑफिसर या पदावर होते. योग्य अनुभवानंतर त्यांची पदोन्नती अडिशनल सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, अडिशनल आय.जी.पी., आय.जी.पी., व अंतिमत डी.जी.पी. (डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस) अशी होते. तसंच आय.पी.एस. अधिका-यांची वेळोवेळी स्पेशल प्रोटेक्शन फोर्स व पॅरॉमिलिटरी फोर्समध्ये केंद्र सरकारद्वारा नियुक्ती केली जाते.
सेंट्रल पोलीस फोर्सेस (सी.पी.एफ.)
सी.पी.एफ. म्हणजे सेंट्रल पोलीस फोर्सेस. भारतीय राज्य घटनेनुसार सुव्यवस्था (पब्लिक ऑर्डर) व पोलीस हे दोन्ही विषय राज्य सरकारांच्या अधिकारात येतात. मात्र केंद्र सरकार पॅरामिलिटरी फोर्सेसच्या माध्यमातून राज्यांना या कामात आवश्यकतेनुसार मदत करत असते. भारत सरकारच्या गृहखात्याच्या अंतर्गत पॅरामिलिटरी फोर्सेसचं कार्य चालतं. सध्या असे सहा फोर्सेस देशात कार्यरत आहेत. आसाम रायफल्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, (बी.एस.एफ.), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आय.टी.बी.पी.), सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सी.आय.एस.एफ.), सेंट्रल रिझव्र्ह पोलीस फोर्स (सी.आर.पी.एफ.) व नॅशनल सिक्युरिटी गार्डस (एन.एस.जी.) यातील प्रत्येक फोर्सची स्थापना विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून केली गेली आहे.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स
सीमावर्ती राज्यांमधील विविध सुरक्षा दलांना एकत्रित करून १९६४ मध्ये बी.एस.एफ.ची स्थापना केली गेली. हे दल ६ हजार ४३३.७ कि.मी.ची आंतरराष्ट्रीय सीमारेषा व २३७.२० कि.मी. नियंत्रण रेषा यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतं.
सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्स
जुल १९३९ मध्ये म्हणजे ब्रिटिश काळात क्राऊन्स रिप्रेझेंटेटिव्हज पोलीस नावाने स्थापन झालेल्या या दलाचं नाव नंतर बदलून सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स असं करण्यात आलं. १ लाख ८२ हजार १६३ जवानांचं हे दल देशाची अंतर्गत सुरक्षा, अतिरेकी व घुसखोरी कारवाया (उदा. नक्षलवादी गट) रोखण्याचं काम करतं.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस
चिनी आक्रमणाच्या धक्क्यानंतर २४ ऑक्टोबर १९६२ मध्ये या दलाची स्थापना केली गेली. काराकोरम पास ते लिपुलेख पासपर्यंत २ हजार ११५ कि.मी. लांबीचा सीमावर्ती परिसर या दलाच्या दक्ष देखरेखीखाली सुरक्षित ठेवला जातो.
वर उल्लेख केलेल्या बी.एस.एफ, सी.आर.पी.एफ. व आय.टी.बी.पी. तसेच सीमा सुरक्षा दल (एस.एस.बी.) या चार सेवांतील अधिकारी पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला सेंट्रल पोलीस फोर्सेस (असिस्टंट कमांडंट) एक्झाम असं नाव आहे. साधारणतः दरवर्षी सर्व मिळून दोनशे जागा असतात. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते.
परीक्षेचं स्वरूप
लेखी परीक्षा - परीक्षेचा प्रथम टप्पा म्हणजे चारशे गुणांची लेखी परीक्षा. या परीक्षेत प्रत्येकी दोन तासांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात.
प्रश्नपत्रिका - सामान्यक्षमता व बुद्धिमत्ता याचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून एकूण गुण २५० असतात. प्रश्न इंग्रजी व हिंदी भाषेतून विचारले जातात. या प्रश्नपत्रिकेत पुढील विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश असतो.
सामान्य बौद्धिकक्षमता, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय), भारतीय राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था, भारताचा इतिहास, भारतीय व जागतिक भूगोल.
प्रश्नपत्रिका - निबंध, सारांश लेखन व आकलन या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वर्णनात्मक असून एकूण गुण १५० असतात. निबंध इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून लिहिण्याची अनुमती असते. मात्र सारांश लेखन व आकलनात्मक प्रश्नांची उत्तरं केवळ इंग्रजी भाषेत लिहिणं अनिवार्य असतं.
शारीरिकक्षमता चाचणी - लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी ना फिजिकल एफिशियन्सी टेस्ट (पी.ई.टी.) व वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं जातं. पुढील शारीरिकक्षमता चाचण्या घेतल्या जातात. १०० मीटर धावणे शर्यत. ८०० मीटर धावणे शर्यत. लांब उडी (तीन प्रयत्न). उंच उडी (तीन प्रयत्न) गोळाफेक (७.२६ कि.ग्र.)
मुलाखत/व्यक्तिमत्त्व चाचणी
वरील दान टप्प्यांतून पात्र ठरणा-या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येतं. याला एकूण २०० गुण असतात. अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षा व मुलाखतीमधील एकत्रित गुणांच्या आधारे लावण्यात येते.
पात्रता
वय- किमान वय २० वर्षे व कमाल वय २५ वर्षे असतं. मात्र पुढील वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा काही वर्षे शिथिल केली आहे. अनुसूचित जाती/जमाती (५ वर्षे), अन्य मागास जाती (३ वर्षे), माजी सैनिक/केंद्र सरकार कर्मचारी (५ वर्षे), अनु.जाती/जमातीमधील माजी सनिक वा केंद्र सरकार कर्मचारी (१० वर्षे), ओबीसीमधील माजी सैनिक/केंद्र सरकार कर्मचारी (८ वर्षे).
शिक्षण- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले अथवा पदवीच्या अंतिम वर्षांत शिकणारे विद्यार्थी.
अन्य- सी.आर.पी.एफ.साठी पुरुष व महिला उमेदवार दोघेही पात्र असतात. बी.एस.एफ., एस.एस.बी. व आय.टी.बी.पी.साठी केवळ पुरुष उमेदवार पात्र ठरतात.