मोठमोठी स्वप्नं अनेक जण बघतात, मात्र ती पूर्ण कशी करायची, हे आपल्याला नेमक समजत नाही.त्यातून नैराश्य येतं. नैराश्यामुळे कमकुवतपणा येतो आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. कुठलंही काम आपण एकाग्रतेने करू शकत नाही. नोकरदार असू, तर नोकरीच्या ठिकाणी जाण्याचं मन होत नाही, मात्र ऑफिसला जाण्याशिवाय पर्यायही नसतो. अशा वेळी सर्वप्रथम मनाची मरगळ दूर करायला हवी तरच आपलं स्वप्न, ईप्सित गाठता येणं शक्य आहे.यासाठी काय करता येईल ते पाहूया.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे `असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' हा विचार सोडून द्यायला हवा. आपली ध्येयं, स्वप्नं आपल्यालाच निश्चित करावी लागतात. त्यासाठी गरज पडल्यास आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करायला हवा. इतरांपेक्षा काही वेगळं करायचं असेल तर त्यासाठी वेगळे प्रयत्नही करायला हवेत. ध्येय गाठण्यासाठी पुढील गोष्टी नक्की उपयोगी पडतील.
आत्मविश्वास गमावू नका
आत्मविश्वास कायम राखणं, ही गोष्ट तशी कठीणच, पण, प्रयत्न करून पाहा. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही की, आपण सभोवतालच्या परिस्थितीबाबत कायमच तक्रार करतो. तसं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. परिस्थिती बदलता येत नाही म्हणून आपण चिंता करत बसतो. या अतिचिंतेपायी आपण कुठलंही काम एकाग्रतेने करू शकत नाही. त्यातूनच आपण स्वतःची ओळख, आत्मविश्वास गमावतो. शिकण्याच्या काळात होणा-या चुका वरिष्ठांकडून गृहित धरलेल्या असतात. म्हणूनच चुका झाल्यास दुःखी होऊ नका, पण याचा अर्थ कायमच चुका करा असाही नाही. होणा-या चुकांची कारणं शोधा. कारणं सापडली की आपोआप चुकाही कमी होतील. चुका कमी झाल्या की आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल. स्वप्नं आणि ध्येय यात गल्लत होता कामा नये. सोबत वास्तवाचा विचार न केल्यामुळेही आपण दुःखी होतो. आजूबाजूचेच लोक आनंदी कसे किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी त्यांच्याकडेच कशा असे विचार आपण करत राहतो. यापेक्षा `माझं काय चुकतंय?' हा प्रश्न स्वतःला विचारावा. मग लक्षात येईल की, तुम्ही ध्येयाच्या मागे धावत असता आणि इतर
माणसं त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचलेली असतात एवढाच त्यात फरक आहे.
कृती करा
कोणतंही ध्येय गाठण्यासाठी योग्य वेळी कृती करणं महत्त्वाचं ठरतं. ध्येय निश्चित झाल्यावर ते गाठण्यासाठी काय करायला हवं हे मनाशी पक्क ठरवा आणि त्यादिशेने पावलं उचला. तुमचं ध्येय लिहून ठेवा. त्या ध्येयापर्यंत कसं पोहोचता येईल याचा विचार करा. कामं विभागून घ्या. एका वेळी एकाच कामावर लक्ष द्या. आपलं काम अचूक आणि वेळेत कसं पूर्ण होईल हे पाहा. प्रत्येक काम घडयाळ्याच्या काटयानुसार केलंत तर तुमची प्रगती निश्चित असते. एकदा हे अमलात आणलंत, की परिस्थिती कितीही विरोधात गेली तरीही न डगमगता त्या परिस्थितीचा सामना करून आपलं ध्येय गाठता येईल.
स्वत:ला विजेता समजा
आत्मविश्वास ढळू द्यायचा नसेल तर स्वतःला विजेता समजा. पण विजेता होण्यासाठी कुठूनतरी सुरुवात करावीच लागते. ध्येयपूर्ती झालेल्या विजेत्यांनी त्यांच्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी कुठूनतरी सुरुवात केलेलीच असते ना! सुरुवातीला यांच्यांकडेही आत्मविश्वासाचा अभाव असू शकतो. मात्र आपलं ध्येय काय आहे, याची त्यांना पक्की माहिती असते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचललेली असतात. ध्येय गाठण्यासाठी त्यांनाही विविध अडथळे पार करावे लागलेले असतात, मात्र ते त्या अडथळ्यांमध्ये अडकून पडत नाहीत. आपल्याला उत्तम करिअर घडवायचंच आहे, असा विचार करा. आपल्याकडून कमीत कमी चुका होतील याची दक्षता घ्या. आपलं काम चांलंच आहे, असं स्वतःला बजावा, म्हणजे कामाचा हुरूप येऊन कार्यक्षमता वाढेल आणि तुमची कामगिरी उत्तम होईल.