राष्ट्रीय शैक्षणिक परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट(नेट)घेण्यात येते. या परीक्षेद्वारे कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्यासाठी तसेच कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता ठरविण्यात येते. वर्षातून दोन वेळा, जून आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी एकदा ही परीक्षा आयोजित केली जाते. त्यात तीन लेखी पेपर असतात. यापूर्वी परीक्षेचा तिसरा पेपर दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये घेतला जात असे. मात्र, यापुढील काळात तिस-या पेपरसह ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे. या तिन्ही पेपरसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही. या बदललेल्या स्वरूपाचे ठळकपणे सांगता येणारे काही फायदे तर काही तोटे पुढीलप्रमाणे...
फायदे - उत्तरपत्रिका तपासताना व्यक्तिनिष्ठतेऐवजी वस्तुनिष्ठतेने मूल्यमापन होईल, पेपर तपासणीविषयीची संदिग्धता कमी होईल, पेपर अपूर्ण राहण्याची शक्यता कमी होईल, निकाल लवकर मिळणे शक्य होईल.
तोटे - व्याख्यात्याच्या स्वतंत्र विचार मांडण्याच्या कौशल्यावर गदा आली, परीक्षा स्मृतिधिष्ठित बनली, अभ्यासाचा आवाका खूप वाढला. या स्वरूपाचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी. बदललेल्या स्वरूपामुळे अभ्यासाची दिशा आणि अभ्यासाची पद्धतही बदलावी लागणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी पुढील बाबींचा विचार करावा.
सखोल अभ्यास - परीक्षेच्या वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपामुळे विषयाचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. तिस-या पेपरमधले प्रश्न प्रामुख्याने आकलन, उपयोजित कल आणि सखोलता तपासणारे असले, तरी त्या त्या विषयांचा सर्वांगाने आणि खोलात जाऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. सरावाला नाही पर्याय- बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याचा कसून सराव करावा लागणार आहे. अशा सरावामुळे ऐन परीक्षेत उत्तरपत्रिकेवर काळ्या शाईने अचूक पर्याय रंगवणे सोपे जाईल. त्यासाठी विद्याथ्र्यांनी ओएमआर उत्तरपत्रिकेवर सराव करायला हवा.
स्वप्रयत्नांवर भर -अभ्यास करताना महत्त्वाचे वाटणारे संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न लगेच अधोरेखित करा किंवा लिहून काढा. जर तुम्ही स्वतःच वस्तुनिष्ठ प्रश्न तयार केलेत तर अभ्यास चांगला होण्यासाठी मदतच होईल.
घड्याळाकडे लक्ष - या नव्या आणि बदललेल्या स्वरूपामुळे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विचार करण्यासाठी विद्याथ्र्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. तरीही एका प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा, त्याचे नियोजन करायलाच हवे. प्रत्येक प्रश्नासाठी साधारणपणे दीड ते दोन मिनिटांचा वेळ मिळेल.
अचूकतेवर भर - बहुपर्यायी प्रश्न सोडविण्यासाठी अचूक पर्याय निवडण्याचे कौशल्य विकसित करा. निगेटिव्ह मार्किंग नसले तरी अचूक उत्तरे लिहिण्याचा असा प्रयत्न केल्याने तुमचा फायदाच होईल.
एकमेका साह्य करू - एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा ग्रुपमध्ये अभ्यास करा. तेव्हा चर्चा करा. वादविवाद घाला. अशाप्रकारचा अभ्यास जास्त लक्षात राहतो