याचबरोबर केवळ इंग्रजी भाषेतील उता-यावर आधारित आकलनाचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. याचाच अर्थ असा की, उता-यावर आधारित सर्व प्रश्नांकरता उतारे इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. मात्र, उता-यावर आधारित प्रश्नांची संख्या यामुळे कमी होणार का, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आयोगाच्या सूचनापत्रातून मिळत नाही.वरील बदलांचे स्वरूप लक्षात घेता सीसॅटच्या पेपरमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे किती प्रश्न असतील व त्याकरता कोणते परीक्षा तंत्र अवलंबले पाहिजे याचा विचार करणे आवश्यक आहे. वरील बदलांचे काही परिणाम हे निश्चितच उमेदवारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत तर काही बदल उमेदवारांना अडचणीत टाकणारे वाटू शकतात. नवीन बदलानंतर सीसॅटच्या पेपरचा उपयोग केवळ मुख्य परीक्षेकरता पात्र होण्यासाठी केला जाऊ शकत नाही. सीसॅटच्या पेपरमध्ये भरमसाठ गुण व सामान्य अध्ययनामध्ये जेमतेमच गुण असे परीक्षातंत्र आता वापरता येणार नाही.
मात्र याचाच दुसरा परिणाम असा की, सामान्य अध्ययनाच्या पेपरवर आधारित स्पर्धा अधिकच अटीतटीची होणार आहे. सामान्य अध्ययनाच्या पेपरमधील थोडयाफार गुणांच्या फरकामुळेदेखील अनेक उमेदवारांचे भविष्य निश्चित होईल. सीसॅटच्या पेपरची या आधीची काठिण्यपातळी लक्षात घेतली तर 33 टक्के गुण मिळवणे हे निश्चितच आव्हान नव्हते असे अनेकांना वाटत असणार. मात्र, याच काठिण्यपातळीचा पेपर पात्रता ठरवण्यासाठी काढला जाईल हे थोडेसे अनपेक्षितच आहे. म्हणूनच उमेदवारांनी सीसॅटचा पेपर केवळ पात्रतेसाठी आहे, म्हणून तो आधीप्रमाणेच सोपा असेल असे गृहीत धरून चालणार नाही. आधीइतकीच काठिण्यपातळी असलेला पेपर आल्यास सामान्य अध्ययनातील स्पर्धा कल्पनेपलीकडील होईल हे मात्र निश्चित. इतक्या कमी काठिण्यपातळीचा पेपर पात्रतेसाठी ठेवल्यास भविष्यात तो नसल्यासारखेच वाटू शकेल. म्हणूनच असे होणार नाही असे समजण्यास पुरेसा वाव आहे. याचाच अर्थ 33 टक्के गुण मिळवण्यासाठीदेखील अनेकांना कसून प्रयत्न करावे लागतील असा पेपर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामान्य अध्ययनाच्या पेपरवर खूप लक्ष केंद्रित केले पाहिजे. याचे कारण यावरच आता गुणवत्ता यादी व पर्यायाने मुख्य परीक्षेतील संधी अवलंबून असेल. मात्र, सामान्य अध्ययनावर भर देत असताना सीसॅटच्या पेपरमुळे त्यात अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून सीसॅटच्या पेपरकडे संपूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाही. सीसॅटच्या पेपरची तयारी करत असताना किंवा सराव परीक्षा देत असताना उमेदवारांनी नियमितपणे 50 टक्के मिळविण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. म्हणजेच 200 पकी 100 गुण विविध सराव परीक्षांमधून सातत्याने मिळवता आले पाहिजेत. असे ध्येय ठेवत असतानाच आपण देत असणा-या सराव परीक्षादेखील विविध काठिण्यपातळीच्या आहेत याची खातरजमा करून घ्यावी. याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे जरी परीक्षेच्या दिवशी पेपर अपेक्षेपेक्षा अधिक कठीण असला तरी साधारण 75-80 गुण मिळवणे सहज शक्य होईल.
केवळ इंग्रजी भाषेतील उतारे विचारले जाणार नसल्यामुळे एकूण परीक्षेबद्दलच्या व्यूहरचनेमध्ये फार मोठा फरक पडणार नाही. याचे कारण इतर उतारे इंग्रजीत वाचायला लागू शकतील अशी तयारी उमेदवारांनी कायमच ठेवली पाहिजे.हिंदी भाषांतरित उता-यावर खूप भिस्त ठेवून चालणार नाही. याचे एक कारण म्हणजे भाषांतरित हिंदी उतारा अनेक हिंदी भाषक नसलेल्यांनाआव्हानात्मक वाटू शकतो. दुसरे कारण म्हणजे इंग्रजी उता-याचे दिलेले हिंदी भाषांतर वाचण्यास सोपे व समजण्यास सुलभ असेलच असे नाही. या सगळ्या घटकांचा विचार करूनच उमेदवारांनी उता-याच्या प्रश्नांकरता आपली व्यूहनीती निश्चित करावी.
यूपीएससीने सुचवलेल्या या सगळ्या बदलांचा विचार करता उमेदवारांनी आपल्या दैनंदिन अभ्यासाच्या नियोजनात सीसॅटच्या पेपरच्या तयारीकरता जाणीवपूर्वक वेळ ठेवावा. नियमितपणे सराव परीक्षांमध्ये 90-100 गुण मिळत राहण्यासाठी आवश्यक इतका वेळ या परीक्षेकरता देणे गरजेचे आहे. कारण अर्थातच ही परीक्षा उमेदवारांच्या सामान्य अध्ययनातील गुणवत्तेची चाचपणी करण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे. परीक्षातंत्र समजून घेऊन त्याबद्दलची व्यूहनीती निश्चित करण्याकरता सराव परीक्षांचा अर्थातच खूप मोठा वाटा असणार आहे.