निबंधलेखन, पत्रलेखन, भाषांतर, व्याकरण, सारांश, उता-यावरील प्रश्न आता आपण निबंधाची तयारी कशी करायची ते पाहू.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमानुसार मराठी अनिवार्य या विषयातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध होय. सुमारे 500 शब्दांत एका विषयावर निबंध लिहिणं अपेक्षित आहे. यासाठी 20 ते 25 गुण निर्धारित केले जाण्याची शक्यता आहे. निबंधामध्ये उमेदवाराच्या भाषाविषयक कौशल्याचं दर्शन होतं, यात शंका नाही, मात्र निबंध म्हणजे निव्वळ शब्दफूलोरा असू नये. निबंधात उमेदवाराचा स्वतंत्रपणे अभ्यास, विचार करण्याची क्षमता, चिकित्सकपणा, विचारमंथन करण्याची क्षमता.. इत्यादी सर्व गुणकौशल्यांचं दर्शन होतं. उमेदवाराने निबंधात विचारपूर्वक पद्धतशीरपणे आपलं मत मांडावं, ही अपेक्षा आहेच. मात्र त्याबरोबर आपला विचार प्रभावीपणे अभिव्यक्त करण्याची शैलीदेखील असावी. थोडक्यात, आशय व अभिव्यक्ती दोन्हींचा समतोल निबंध होय.
वस्तुत: निबंध म्हणजे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रिितबबच असतो. अनेक उमेदवारांना असं वाटतं की, निबंधलेखन म्हणजे अनेक मान्यवरांच्या वक्तव्यांना उद्धृत करणे होय. म्हणून अनेकदा मोठया व्यक्तींच्या चार वाक्यांनी निबंधाची सुरुवात होते. मात्र प्रत्यक्ष निबंधाचा विषय, ती चार वाक्यं आणि नंतरचा निबंध यात ब-याचदा खूप तफावत जाणवते. निबंध मान्यवरांना उद्धृत करण्यासाठीची जागा नव्हे, तर उमेदवाराने त्याचे विषयासंबंधीचे नियोजनबद्ध, विचारपूर्वक म्हणणे मांडण्याची जागा आहे. निबंध लिहायचा असतो, याची उमेदवाराने सतत जाण ठेवावी. त्यादृष्टीने त्याने नियमितपणे लिखाणाचा सरावा करावा. लेखन सुवाच्च, वाचनीय हस्ताक्षरात असावं. सुरुवातीला लिहिलेलं आपणच तपासावं, इतरांकडून तपासून घ्यावं, चुकांचा परामर्श घेत, टप्प्याटप्प्याने त्यात सुधारणा करावी. असं केल्याने शेवटी परीक्षेत लिहिताना लेखनाची गती, शैली, शब्दसंचयातील अर्थपूर्ण अचूकता, विषयाला धरून मुद्देसूदपणाने प्रभावीपणे लिहून परीक्षकावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक प्रभाव पाडता येतो. लेखन शब्दमर्यादेत आणि विषयाला अनुसरून करणं हे सरावामुळेच शक्य होतं.
निबंध या शब्दाचा अर्थ `बंध नसलेले लेखन' असा होतो. मात्र, हे बंध नसणे म्हणजे हरिदासी कीर्तन नसावं. प्रश्नपत्रिकेत शब्दमर्यादा व निवडलेल्या निबंध विषयाचे बंधन असतेच. विषय काळजीपूर्वक वाचावा. लेखन दिलेल्या संपूर्ण विषयावर करायचे आहे, त्यातील एका भागावर नाही, याचं भान असावं. ज्या विषयावर आपण सविस्तरपणे लिहू शकू अशी आपल्याला खात्री असेल, असाच विषय निवडावा. विषय निवडल्यावर `कच्चे काम' करण्याच्या उत्तरपत्रिकेतील पानावर विषय विस्तार घडवला जाणार याबाबत एक आराखडा तयार करावा. मुद्दे निश्चित करावेत, निबंधाचा आकार कसा असेल हे ठरवावं आणि नंतरच प्रत्यक्ष लेखन करावं. म्हणजे वेळेचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. निबंधलेखनासाठी नेमकं, सकस आणि विचारप्रवर्तक वाचनसाहित्य महत्त्वाचं ठरतं. वाचन करताना चालू घडामोडीसंबंधी विषयांच्या विविध पैलूवर विविध माध्यमांमध्ये चालणा-या साधकबाधक चर्चा उमेदवाराने ऐकाव्यात, पाहाव्यात, वाचाव्यात. एखाद्या विषयाला किती बाजू व पैलू असू शकतात हे जाणून घ्यावं. तसंच हे सर्व किती प्रकारे अभिव्यक्त केलं जातं हे समजून घ्यावं. राष्ट्रीय वर्तमानपत्रं, रेडिओ, दूरचित्रवाणीतील विविध चॅनेल्स यातून विविध प्रश्नांकडे विचारवंत, तज्ज्ञ, सर्वसामान्य माणसं कसं पाहतात हे जाणून घेतल्यानेच उमेदवार समृद्ध होत जातो. म्हणून प्रत्येक विषय समजून घेताना; त्या विषयाच्या संज्ञा-संकल्पना, विषयाची सविस्तर, मुद्देसूद माहिती, विषयाचा वर्तमानापर्यंतचा प्रवास,त्याविषयीची मतं इ. सर्व बाबी जाणून, समजून घ्याव्यात. त्यासाठी आवश्यक ती माध्यमं धुंडाळावीत, टिपणे बनवावीत, लेखन करावे. माहितीसाठी सदैव अद्ययावत असावं. कित्येक उमेदवार कोणत्याही निबंध विषयाला दोनच बाजू असतात, असा भ्रम करून घेतात. 1990 नंतरच्या जगाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय म्हणजे प्रश्नांची उत्तरे द्वैती नसतात; तर अनेकांगी असतात याचं भान होणं. कोणत्याही विषयाला दोन नव्हे तर अनेक बाजू असतात व आपल्या निबंधलेखनामध्ये त्यातील अनेकांचा ऊहापोह करणं उत्तम असतं. मात्र, निव्वळ ऊहापोह करू नये, तर सदोदित अधोरेखित व्हावं. म्हणजे उमेदवाराला काहीतरी मूलगामी, प्रगल्भ विचार मांडायचा आहे, असं तुमच्या लेखनातून स्पष्ट जाणवलं पाहिजे. शैली व भाषा हे निबंधातील महत्त्वाचे घटक आहेत. उमेदवारांची स्वतंत्र लेखनशैली असावी. ती क्लिष्ट, खूप गुंतागुतीची नसावी. कोणताही मुद्दा ठाशीवपणे, सहज, सोप्या, मात्र नेमक्या शब्दांत मांडावा. लेखनशैली अशी असावी की, ज्यामुळे आपले मत अरेरावीपणाचे, मग्रुरीचे वाटणार नाही. भाषेची निवड उमेदवाराने काळजीपूर्वक करावी. शब्दसंचय पुरेसा असेल, वाक्यरचना नेमकेपणाने जमेल, याची काळजी उमेदवाराने घ्यावी. निबंध ललित्य व वस्तुनिष्ठतेचा समतोल साधणारा असावा. निव्वळ जोरदार सुरुवात वा आकर्षक शेवट यावरच जोर देऊ नये. लेखनातील दमदारपणा सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहिला पाहिजे. शेवटी असं म्हणता येईल की सखोल, विचारप्रवण मात्र चिंतनात्मक वाचन, मुद्देसूद, शब्दमर्यादेत राहून केलेला लेखनसराव जसा महत्त्वाचा तसाच निबंधलेखनासाठी निवडलेल्या विषयाचा कल्पकपणे विचार करून विस्तार करणंही महत्त्वाचं! शब्दसंख्येचे भान ठेवत, लेखनात नेमकेपणाची हमी द्यावी.
मला निबंध चांगला लिहिता येईल, अशाप्रकारे विचार करणं किंवा बोलणं सोपं आहे. निबंध स्वत: लिहून तपासून घ्यावेत. लिहिल्याशिवाय त्यामधील तुमच्या उणिवा समजणार नाहीत म्हणून ठरावीक विषयाची निवड करून त्याचा एकदम व्यवस्थित सराव करावा. सरावानेच निबंधात सुधारणा होईल