जानेवारी 2012 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचे नवे प्रारूप प्रकाशित केले. बदललेल्या अभ्यासक्रमाच्या आराखडयासोबत परीक्षा पार पडल्या. मागील दोन-तीन वर्षांतील परीक्षांचे निकाल, गुणांचे कटऑफ, यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहता लक्षात येते की, या परीक्षेची काठिण्यपातळी वाढली आहे. अभ्यासक्रमाची लांबी-रुंदी पाहता अभ्यासाची खोली वाढवावी लागणार आहे. यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाशिवाय दुसरा पर्याय नाही.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित प्रारूपात एकूण सहा पेपर 800 गुणांसाठी असतात. हे सर्व पेपर अनिवार्य स्वरूपाचे असतात. मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांचे वर्णनात्मक स्वरूपाचे पेपर प्रत्येकी 100 गुणांसाठी असतात. सामान्य अध्ययन विषयाचे एकूण चार अनिवार्य पेपर असून ते वस्तुनिष्ठ – बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. प्रत्येकी 150 गुणांसाठी असणा-या या पेपर्सना निगेटिव्ह मार्किंग (3-1) लागू आहे. मुख्य परीक्षेच्या गुण पद्धतीत पर्सेटाइल पद्धत लागू आहे. पर्सेटाइलप्रमाणे गुणवत्ता निश्चित होऊन मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात. सामान्य अध्ययन विषयाच्या चार प्रश्नपत्रिका खालीलप्रमाणे-
1. सामान्य अध्ययन पेपर 1 - इतिहास, भूगोल व कृषी.
2. सामान्य अध्ययन पेपर 2 - भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण (महाराष्ट्रच्या विशेष संदर्भासहित) आणि विधी.
3. सामान्य अध्ययन पेपर 3 – मानवी साधनसंपत्ती व मानवी हक्क.
4. सामान्य अध्ययन पेपर 4 – अर्थव्यवस्था व नियोजन, विकासाचे व कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान विकास.
लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला एक टीप छापली आहे. ती अशी की, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल, की एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयांतील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे. याचा अर्थ प्रश्नांची उत्तरे विषयाच्या विशेष प्रावीण्याशिवाय देता येणे अपेक्षित आहे. अर्थात अभ्यासक्रमात नमूद केलेल्या अभ्यास घटकातील सर्व मूलभूत संकल्पना सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पायाभूत अभ्यास आणि चालू घडामोडींचे आकलन या दोन्हींचा मेळ आवश्यक आहे.