दुस-यांच्या हस्तक्षेपापासून बचाव - आपापसांत बोलून आपल्या कामासोबतच व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणा-या अनेक चांगल्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. त्याचबरोबर एक अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे आपण बाहेरच्या व्यक्तींना आपलं कार्य आणि वेळेमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करू देऊ नये. असं केलं तर आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकत नाही.
वर्तमानाचं भान राखा - आपली दिनचर्या आधीच ठरवून घ्यावी. म्हणजे आपली ऊर्जा, दक्षता आणि वेळेचा योग्य उपयोग करता येईल. केवळ वर्तमानकाळ हेच जीवनाचं सत्य आहे. आपण वर्तमानाद्वारेच अधिक ओळखले जातो. त्यामुळे भविष्याबाबत जास्त चिंतीत राहण्याची गरज नाही. सोबत चिंता घेऊन जगल्यास आपण काहीही मिळवू शकणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं.
प्रत्येक पाऊल ध्येयाच्याच दिशेने - एखादी गोष्ट आपल्या कामाशी निगडित नसेल तर स्वतःला तिच्यापासून लांबच ठेवावं, जेणेकरून त्या वेळेचा उपयोग अन्य आवश्यक कामांसाठी करू शकतो. आपण जे काही काम करू ते उद्देशाला अनुरूप आणि ध्येयाच्या दिशेने जाणारं असावं.
रणनीतीवर विश्वास असावा - आपण वेळ व्यर्थ घालवत आहोत याची आपल्याला जाणीव होते तोपर्यंत आपण बराच वेळ घालवलेला असतो. हे सत्य आहे. म्हणूनच आपण जे ध्येय निश्चित केलं आहे, आणि ते साध्य होण्यासाठी जो मार्ग स्वीकारला आहे, जी रणनीती तयार केली आहे त्याबाबत मनात संदेह असता कामा नये.
स्वतःचं योग्य मूल्यांकन करा - एका निश्चित वेळेनंतर आपण स्वतःचं मूल्यांकन केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्वतःची क्षमता आणि दिशेचं ज्ञान होऊ शकेल. आपण योग्य मार्गावर चाललो आहोत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सातत्याने आपले ध्येय आणि रणनीती तपासावी लागेल. आपण जीवनात जे ध्येय निश्चित केलं आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्या व्यक्तिगत क्षमता तपासणंदेखील अत्यंत गरजेचं आहे.
दैनंदिन कार्याची समीक्षा करा - प्रत्येकाला वेळ सारखीच असते. आपण तिचा योग्य प्रकारे कसा उपयोग करतं हे महत्त्वाचं असतं. निर्धारित ध्येय प्राप्त करण्यासाठी दैनंदिन कार्य किंवा दिनचर्यची सुखद जाणीव होणंदेखील गरजेचं असतं. म्हणून आपण वेळोवेळी या गोष्टींची समीक्षा करत राहावे. ठरावीक अंतर पार केल्यानंतर पुन्हा नवी योजना बनवण्याऐवजी त्यामधील सातत्य महत्त्वाचं असतं. आपल्या व्यक्तिगत विकासासाठी जी गोष्ट सर्वात जास्त सहाय्यक सिद्ध होऊ शकते ती म्हणजे वेळ होय.
रागावर नियंत्रण – आपल्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात जी गोष्ट अडचणीची ठरू शकते तिचा त्याग करावा. जी गोष्ट इतर लोक सहजपणे आणि उत्तम पद्धतीने करतात ती करण्यासाठी आपल्याकडे विशेष योग्यता हवी. स्वतःमध्ये जबाबदारीची आणि उत्तरदायीत्व असण्याची भावना विकसित करावी. आपण प्रत्येक वेळी दुस-या व्यक्तीवर नाराज होत असू तर त्यामुळे आपण स्वतः आनंदी राहू शकणार नाही आणि इतरही आपल्यामुळे प्रसन्न होऊ शकणार नाहीत.
स्वतःलाच प्रश्न विचारा – ऑफिसमधील गोष्टी नोंदवणं जितक गरजेचं तितकच दैनंदिन वापरातील गोष्टी नोंदवून ठेवणंही गरजेचं असतं. असं करणं म्हणजे वेळ दवडणं नव्हे. उलट असं केल्यामुळे आपण अधिक वेळ वाचवू शकतो. जीवनात कुठलंही ध्येय प्राप्त करताना आणि त्यासाठी संघर्ष करताना स्वतःला नेहमी प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याकडे आवश्यक योग्यता आणि दक्षता आहे का? त्यातून स्वतःची योग्यता पुन्हा एकदा तपासली जाते.
व्यक्तिमत्त्व प्रभावी करा - आपल्या गरजेच्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करावं. असं केल्यास आपल्यामध्ये व्यवसायिक दृष्टिकोनाच्या विकासासोबतच आपलं व्यक्तिमत्त्वदेखील प्रभावी होण्यास मदत होते. अयोग्य कामावर लक्ष केंद्रित करत असाल तर यामुळे आपला वेळ व्यर्थ जात आहे असं समजावं. कारण त्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा तेवढाच वेळ लागेल हे लक्षात ठेवावं. कारण गेलेला वेळ परत येत नाही.
कामावर विशेष लक्ष असावं - वेळेचा योग्य उपयोग करायला शिकावं. वायफळ कामात वेळ व्यर्थ घालवू नये. एक यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती अथवा नेता तोच असतो जो आपलं कार्य हाताखालील व्यक्तींमध्ये योग्य प्रकारे विभागतो. जे कार्य करत असाल त्यावरच लक्ष केंद्रित करा. पुढे जाण्याचा तोच एक मार्ग आहे. यशस्वी बनण्यासाठी एवढया गोष्टींचं पालन काटेकोरपणे केलंत तर यश तुमच्यापासून फारसं दूर नाही, हे निश्चितपणे समजावं.