मुख्य परीक्षेचा नवा आराखडा
नव्या बदलातील मध्यवर्ती घटक म्हणजे सामान्य अध्ययनाचे वाढलेले महत्त्व होय. त्यानुसार पेपर २ ते पेपर ५ हे सामान्य अध्ययनाचे नवे, सुधारित आणि विस्तारित विषय आहेत. म्हणजेच आता सामान्य अध्ययनाचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी ६०० गुणांसाठी असलेला सामान्य अध्ययन हा विषय आता १००० गुणांचा करण्यात आला आहे. पेपर.२ (सा.अ.१), ३ (सा.अ.२) आणि ४ (सा.अ.३) मध्ये अभ्यासक्रमाचा विस्तार करून आयोगाने चांगले पाऊल टाकले आहे,
यात शंका नाही. आयोगाने पेपर.५ (सा.अ.४) हा एक नवा विषय मुख्य परीक्षेच्या रचनेत समाविष्ट केला आहे. प्रशासनात भरती होऊ इच्छिणा-या विद्याथ्र्यांकडे सार्वजनिक सेवक म्हणून कार्य करण्यास आवश्यक नैतिकता, सचोटी, प्रामाणिकपणा व योग्य दृष्टिकोन असला पाहिजे, त्यादृष्टीनेच आयोगाने हा विषय स्वीकारला आहे. सामान्य अध्ययन पेपर ४ चा अभ्यासक्रमही नवा वाटत असला तरी त्यामुळे चिंताग्रस्त होण्याचे कारण नाही. भारतीय राज्यघटना, राज्यघटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, न्याय, बंधू- भगिनीभाव, विविधता या मूल्यांचे भान आणि लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित लोकाभिमुखता या चौकटीच्या आधारेच विद्याथ्र्र्यांची नैतिकता, सचोटी आणि कल तपासला जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमात केलेले बदल हे स्वागतार्हच मानले पाहिजेत. त्यातील प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात आणखी अद्ययावतता आणली आहे. बदलेल्या अभ्यासाची व्याप्ती लक्षात यावी यासाठी सामान्य अध्ययन १, २, ३ आणि ४ या प्रत्येक पेपरमधील अभ्यासक्रमाचे बारकाईने आकलन करणे अत्यावश्यक आहे. या आकलनाद्वारे संबंधित विषयात
जुना-पांरपरिक भाग कोणता? आणि नव्याने समाविष्ट केलेला भाग कोणता, हे लक्षात घ्यावे लागेल.
सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक पेपरमध्ये समाविष्ट केलेला नवा अभ्यासक्रमात समकालीन स्वरूपाचा आहे. सामान्य अध्ययन २ मध्ये भारतातील घटनात्मक यंत्रणेची इतर देशांतील घटनात्मक यंत्रणेशी करावयाची तुलना; विविध घटकांसाठी शासनाने राबवलेली धोरणे, केलेला विकासात्मक हस्तक्षेप या दोन्हींची प्रारूपे आणि अंमलबजावणीतून निर्माण झालेले प्रश्न वा
कळीचे मुद्दे; कारभारप्रक्रियेचे विविध आयाम, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई-शासनाची उपयोजने, प्रारूपे, यशापयश, मर्यादा आणि संभाव्य क्षमता; नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्वाची हमी देण्यासाठी केलेल्या संस्थात्मक व इतर उपाययोजना; सनदी सेवकांची
लोकशाहीतील भूमिका हे घटक स्पष्टपणे नमूद केले आहेत. त्याचप्रमाणे सामान्य अध्ययन ३ मध्येदेखील विविध प्रकारच्या सिंचनप्रणाली व प्रकार; शेतमालाचे उत्पादन, साठवणूक, वहन व विपणन यांतून निर्माण होणारे कळीचे मुद्दे; शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या दिल्या जाणा-या
सवलतीतून निर्माण होणारे कळीचे मुद्दे, अन्नधान्याचा साठा आणि अन्नसुरक्षा इ. मुद्दे ठळकपणे नमूद केले आहेत