ज्या क्षेत्राला प्रतिष्ठा नाही किंवा ज्या नोकरीबद्दल उघडपणे बोलता येत नाही अशा ठिकाणी नोकरी करण्यास सामान्यपणे लोकं फार हौसेने जातातच, असे नाही. काही दिवसांपूर्वीच एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, एकीकडे केंद्रीय गुप्तचर खात्यात ८०० पदे रिक्त आहेत. तर हैदराबाद ही कोणत्या राज्याची राजधानी आहे या प्रश्नाचे उत्तरही माहिती नसलेले उमेदवार जर आमच्यासमोर मुलाखतीला येत असतील तर, खात्याच्या कामगिरीवर मर्यादा पडणार नाहीत का, असा सवाल भारतातील एका अग्रगण्य थिंक टँक ने आयोजित केलेल्या संरक्षणविषयक चर्चासत्रामध्ये गुप्तचर खात्यातील अधिकारी उपस्थित करीत होते.
कामाचे स्वरूप आणि वेगळेपण
या खात्याच्या कामाच्या स्वरूपात प्रचंड वैविध्य आहे. अगदी एकाच वाक्यात सांगायचे तर, सर्वच व्यावहारिक क्षेत्रांमधील मानवी हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने असलेली संशयास्पदता टिपणे हे खरे काम आहे. भारताच्या कार्यकारी मंडळातील शासकीय अधिका-यांच्या नेमणुका, कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायाधीशांच्या नियुक्त्या, भारत सरकारतर्फे दिल्या जाणा-या पद्म पुरस्कारांसाठी निवडण्यात येणा-या व्यक्ती आदींची पाश्र्वभूमी तपासून त्यांना क्लीअरन्स देणे हे गुप्तचर खात्याच्याच कामाचे एक अंग आहे. एखाद्या विशिष्ट मतदारसंघातील/ राज्यातील/ किंवा मध्यावधी निवडणुका घेण्यापूर्वी तेथील परिस्थिती निवडणुका घेण्यायोग्य आहे किंवा कसे याबाबत अहवाल देणे, अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचा कोठेही दौरा असेल तर तेथील सुरक्षितता तपासणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींशी केला जाणारा पत्रव्यवहार-ई-मेल संपर्क यांच्यावर नजर ठेवणे हेही गुप्तचर खात्याचे काम असते. त्याशिवाय, आक्रमक, फ़ुटीरतावादी, देशद्रोही, मूलतत्त्ववादी व्यक्ती-संघटना आदींबाबतही तपशीलवार माहिती गोळा करणे, ती संपादित करणे, त्याची सत्यासत्यता पडताळणे, अतिरेकी संघटनांच्या हालचाली टिपणे-त्यांचे सांकेतिक शब्द डीकोड करणे, देशविघातक शक्ती न्यूट्रलाइज करणे, अशा व्यक्तींची नेटवर्कस जाणून घेणे आणि राज्य तसेच केंद्र सरकारला त्याबाबत माहिती पाठवणे तसेच प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक पोलीस, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांना खबरदारीच्या सूचना देणे असे या खात्याच्या अनेक कामांपैकी काही ज्ञात कामांचे स्वरूप असू शकते. मग यामध्ये वेगळेपणा तो कुठला, असा प्रश्न उपस्थित होतो. तर या खात्यातील नोकरी ही जिग सॉ पझल सारखी आहे. तुमची कोणत्याही क्षेत्रातील अद्वितीय गुणवत्ता ही त्या-त्या क्षेत्रातील माहिती संकलनासाठी गुप्तचर खात्याची निकड आहे. स्वाभाविकच इथे नोकरी करण्यासाठी गुण आणि कौशल्यविषयक पूर्वनिकषांपेक्षा तुमच्याकडे देशासाठी देण्याजोगे काय आहे, हे हेरून त्या अनुषंगाने तुम्हाला इथे संधी दिली जाते आणि हेच या खात्यातील सेवेचे वेगळेपण आहे.
या खात्यातील भरतीप्रक्रिया
सामान्यपणे केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य गृह मंत्रालय अशा दोन्ही पातळ्यांवर ही भरती होते. कधी थेट किंवा ज्याला सरळसेवा भरती म्हणतो त्याप्रमाणे तर कधी द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय परीक्षांद्वारे ही भरती होते. या केंद्र सरकारच्या गृहखात्याच्या संकेतस्थळावर याची जाहिरात व अन्य तपशील पाहायला मिळतो. राज्य सरकारतर्फे ही योग्य ती पूर्वसूचना-जाहिरात देऊनच भरती प्रक्रिया राबविली जाते. त्याशिवाय कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) मार्फतही असिस्टंट सेंट्रल इंटिलिजन्स ऑफिसर (एसीआयओ) आणि इंटिलिजन्स ऑफिसर (नार्कोटिक्स कंट्रोल - अमली पदार्थ नियंत्रण विभाग) या पदांसाठी वर्षांतून एकदा किंवा क्वचित दोनदा परीक्षा घेतली जाते.
पात्रता
अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी अर्हता ही असते. मात्र त्याव्यतिरिक्त अनेकदा गरजांनुसार बारावी उत्तीर्ण आणि काही टेक्निकल पात्रता (तंत्रशिक्षणविषयक पात्रता) असलेल्यांनासुद्धा या सेवांची संधी उपलब्ध असते. अपवादात्मक परिस्थितीत इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि वैशिष्टयपूर्ण कौशल्यांचाही (उदा. ड्रायव्हिंग वगैरे.) नोकरीसाठी विचार केला जातो. त्यामुळे दहावीपासून पदवीपर्यंतच्या सर्वच इच्छुकांनी या भरतीकडे नजर ठेवायला हरकत नाही.
परीक्षेचे स्वरूप
गुप्तचर खात्यातर्फे घेतली जाणारी परीक्षा दोन प्रकारे होते. एक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आणि दुसरे दीघरेत्तरी प्रश्न. भारताचा भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, परराष्ट्र धोरण, विज्ञान-तंत्रज्ञान, गणित (अरिथमॅटिक्स, लॉजिक, रीझनिंग आदी.) आणि चालू घडामोडी तसेच कलतपासणी करणारे प्रश्न यांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेत समावेश होतो. तर दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व तपासले जाते. आव्हाने कोणत्याही परीक्षेत यशस्वी होताना, त्या परीक्षेची तयारी करताना त्या क्षेत्रातील रोल मॉडेल असणे अत्यंत उपयुक्त ठरते.
किंबहुना अशी रोल मॉडेल च आपल्या अभ्यासाला प्रेरणा-ऊर्जा पुरवितात. मात्र गुप्ततेच्या कारणास्तव या क्षेत्रातील अधिकारी फारसे ज्ञात नसतात. स्वाभाविकच आपल्याला स्वयंप्रेरणेने या परीक्षेसाठी तयारी करावी लागते. अनेकदा आपल्याला एखाद्या क्षेत्राविषयी पुस्तकांमधून माहिती मिळते. मात्र दुर्दैवाने, गुप्तचर खात्याबाबत प्रादेशिक भाषांमध्येच नव्हे, तर इंग्रजीमध्येही पुस्तकांची संख्या अन् प्रकाशकांची संख्या फारशी लक्षणीय नाही. त्यामुळे कोणत्याही प्रसिद्धीविना देशसेवेची तयारी असलेल्यांसाठी या क्षेत्राचे आमंत्रण आहे.