एक मोठं ध्येय साध्य करण्यासाठी त्याचं साधन किंवा मार्ग निश्चित करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे त्या मार्गात आयुष्यातल्या काळाच्या हिशोबाने योग्य विभाजनसुद्धा व्हायला हवं. एक लांबचा प्रवास करताना अधुन मधुन येणारी गावं, आपल्या गावाजवळ पोहोचण्याची हुलकावणी देतात. त्याचप्रमाणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग आणि रस्त्यात लागणारी गावं आपण निश्चित करू शकतो. उदा. याआधी सांगितलेला चहावाला त्याला लोकांचं आयुष्य बदलायला मदत करायची आहे; तो ठरवतो की छान हसून बोलून तो सगळ्या ग्राहकांचा मूड सुंदर करेल. याप्रकारे तो एका छोट्याशा वस्तीत हे सगळं करू शकतो, मग जवळच्या एका दुस-या परीसरात चहाची दुसरी टपरी सुरू करेल. काही वर्षानी पूर्ण शहरात त्याच्या शाखा आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर संपूर्ण देशातच नाही तर अखंड जगातही तो आपलं हे कार्य पसरवू शकेल. पण त्यासाठी त्याने व्यवस्थित योजना बनवणं आवश्यक आहे. तर ध्येयसिद्धी अधिक सुकर आणि लवकर होईल.
`फोकस' जमवणे
ध्येयनिश्चिती एकदा कागदावर उतरवल्यानंतर त्यावर आयुष्यभर अटळ राहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपलं ध्येय फोकस करणे अनिवार्य आहे. फोकस जमवणे म्हणजे जी गोष्ट मनाशी ठरवली आहे, त्या गोष्टी व्यतिरिक्त किंवा त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींव्यतिरिक्त आपल्याला काहीही दिसता कामा नये. सतत आपल्या ध्येयाबाबतीतच विचार, कृती, बोलणं, ऐकणं, वाचणं, बघणं अशी मनस्थिती व्हायला हवी.
ध्येयाची उंची
आपलं ध्येय किंवा स्वप्न जितकं कल्पना करता येईल तितकं मोठं आणि उंच ठेवायला हवं. त्याच्याशी आपल्या आजच्या वास्तविकतेचा किंवा कुवतीचा काहीही संबंध असू नये, कारण आपण नेहमी आपल्या क्षमताना कमी लेखत असतो. आपल्या स्वप्नांना ध्येयाला एका मर्यादेत बांधून ठेवतो, ज्यामुळे आपलंच नुकसान होतं. 100 पैकी 100 मार्क मिळवण्याची संधी असताना आपण `70-80' मार्क मिळाले तरी खूप झाले असं म्हणतो आणि 70 मार्कच मिळतात. तसंच जर 100 पैकी 100 मिळवण्याची जिद्द बाळगली तर कमीत कमी 80 चा आकडा सहज पार करता येणं हेही तितकंच शक्य आहे. म्हणून खूप मोठं ध्येय ठेवून ते हुकण्यापेक्षा कधीही छोटं ध्येय ठेवून ते मिळवणं कधीही फायद्याचं ठरतं.