यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी.
वेळेचा योग्य सदुपयोग होण्यासाठी पुढील बाबी करता येतील
-- रोज रात्री झोपण्यापूर्वी दुस-या दिवशी विषयवार करायच्या अभ्यासाची लेखी नोंद करणे. यामुळे कुठल्या विषयाचा अभ्यास करू अन् काय करू हा गोंधळ राहात नाही. संभ्रम संपतो, तिथे शक्तीचा अपव्ययही थांबतो.
--दिवसभर महाविद्यालयातील अभ्यास, शिकवणी वर्गामधील अभ्यास, प्रॅक्टिकल्स, जर्नल्स पूर्ण करणे या अनिवार्य गोष्टींसाठी लागणारा वेळ लक्षात घेत उर्वरित वेळेत स्वअभ्यासाची परिणामकारकता वाढवायला हवी. त्यासाठी प्रत्येक विषयाचे अगदी ठरवून चार-चार प्रश्न रोज तयार करायचे असा नियम केला तर योग्य दिशेने अभ्यास केल्याचे समाधान मिळते. हा दिनक्रम सलग अवलंबला तर महिनाअखेर प्रत्येक विषयाचे किमान 100 प्रश्न तरी तयार होतात.
वेळ वाचवणे - मोबाइलचा अतिरेकी वापर थांबवा. फेसबुक, वॉटस्अॅप, मोबाईल गेम्स यांपासून बोर्डाच्या परीक्षेपर्यंत दूर राहण्याचा निर्धार करणे अत्यावश्यक आहे. त्या ऐवजी मित्रमंडळींचा `स्टडी ग्रुप' बनवून रोज संध्याकाळी एकत्रितपणे ठरवलेले रोजचे अभ्यासाचे लक्ष्य साध्य झाले की नाही याची चर्चा करायला हरकत नाही. आपणही कुणाला उत्तर देण्यास बांधील आहोत ही गोष्ट आपल्यावरच एक सकारात्मक मानसिक दडपण आणते. आणि त्यामुळे ध्येयाकडे वाटचाल सुकर होते.
स्पर्धा स्वत:शी - स्पर्धा खरंतर सकारात्मक प्रेरणा म्हणून स्वीकारायला हवी. स्पर्धा आली तिथे तुलना आली. जेव्हा आपण आपली तुलना `सर्वोत्तम' असलेल्यांशी करतो, तिथे ताण जन्म घेतो. म्हणून आपला भर सर्वोत्तम कामगिरीवर असायला हवा. कालच्यापेक्षा मी आज थोडा का होईना, सरस झालो, अशी निकोप स्पर्धा स्वत- शीच करावी. म्हणजे स्वत-ला स्वत-ची चांगली ओळख होईल.
अभ्यासाचे तंत्र निवडा - यशस्वी विद्यार्थी सर्वप्रथम स्वत-चे खूप छान मित्र असतात. आपल्या क्षमतांबद्दल सजग असतात, प्रामाणिक असतात. ते इतर सगळे विद्यार्थी करतात, त्याच अभ्यासाच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. अधिकाधिक परिणामकारकता वाढवण्यावर त्यांचा भर असतो. आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही काही अभ्यासतंत्रे उपयुक्त पडू शकतील.
मेमरी मॅपचा वापर - `टू रिमेंबर समथिंग, यू मस्ट फरगेट समथिंग.' हा स्मरणशक्तीचा नियम आहे. मग विसरायचं असेल तर अनावश्यक गोष्टींवरचं लक्ष काढून घेतलं पाहिजे आणि आवश्यक गोष्टींचं मनन, चिंतन वाढवलं पाहिजे. रोज सकाळी उठल्यावर अभ्यासाची सुरुवात एखाद्या प्रकरण/धडयातील प्रत्येक टॉपिक आठवून त्याच्याशी निगडित पारिभाषिक शब्दांची उजळणी ट्री डायग्राम, फ्लो चार्ट काढून करावी. लिहून केलेल्या अभ्यासाने मन अधिक केंद्रित होते आणि केंद्रित मनाची ताकद अफाट असते.
साधारणपणे सारख्या असलेल्या विषयांची निवड - रोज विषयवार ठरवलेले मोजके प्रश्न नोंदवहीत लिहिताना, निवडतानाही त्या प्रश्नांची `संकल्पना' सारखी असेल तर तुलनात्मक अभ्यासाने गती वाढते. उदा. बारावीच्या भौतिकशास्त्र विषयात `टोटल एनर्जी'साठी किमान चार धडयांमध्ये `डेरिव्हेशन्स' आहेत. ते चारही `डेरिव्हेशन्स' एकाच दिवशी तयार केलेत तर तुलना करून दोन `डेरिव्हेशन्स'मधील साम्य आणि वेगळेपण लक्षात ठेवणे सोपे जाते व सरावाने ते कायमस्वरूपी लक्षात राहते.
अनोख्या पद्धतीने उजळणी - आपली दैनंदिन कामे करतानाही डोक्यात सूत्र, व्याख्या, नियम यांची उजळणी करणे सहजशक्य आहे. त्यामुळे अभ्यासाच्या वातावरणात रमायला होते. नुसते ठरवून घडयाळी तासांत अभ्यास न करता जमेल तितका जास्त अभ्यास करणे उत्तम.
प्रश्नसंचाचा आगळावेगळा उपयोग करा - साधारणपणे एखाद्या विषयाची चांगली तयारी झाल्यानंतर विद्यार्थी सरावासाठी आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, असा अभ्यास करताना प्रश्नपत्रिका लिहिण्यास पुरेसा वेळ मिळेलच याची खात्री नसते. त्याऐवजी ज्या धडयाची तयारी त्या दिवशी केली, त्यावर आधारित प्रश्न आजवरच्या प्रश्नपत्रिकांमधून शोधून काढावेत आणि सोडवावेत. खरे तर अनेक पुस्तकांमध्ये धडयाखाली आजवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची प्रश्नसूची दिलेली असते. तरीही प्रश्नपत्रिकेतून ते प्रश्न शोधून काढलेले चांगले